चंद्रपूर :-
वेदांता-फॉक्सकानच्या पाठोपाठ नागपुरातील मीहान मध्ये प्रस्तावित टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरात मध्ये गेल्याच्या मुद्द्यावरून नागपूर विदर्भ कर्मभूमी असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भावर घोर अन्याय केलेला आहे.टाटा एअरबसचा २२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प गुजरातला गेल्याने विदर्भाचे प्रचंड नुकसान होणार आहे. विदर्भातील तरुणांना नोकरी रोजगारासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरांची वाट धरावी लागणार आहे. ही सरकार व उपमुख्यमंत्री हे गुजरात समोर लोटांगण घालणारे आहेत अशी टिका उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी केला.
भाजपा नेत्यांनी आजपर्यंत वेगळा विदर्भ आणि विदर्भाच्या अनुशेषाच्या मुद्द्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या आहेत. सत्ता मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्री पद मिळाल्यावर मात्र त्यांना विदर्भाचा विसर पडलेला दिसत आहे. विदर्भाची जनतेची मते घेऊन विदर्भात येणारे प्रकल्प गुजरातला पाठवण्याचे षडयंत्र फडणवीस करत आहेत.फडणवीसांसाठी विदर्भातील जनतेपेक्षा गुजरातच्या साहेबांचे आदेश महत्त्वाचे आहेत त्यामुळे त्यांनी पुढची निवडणूक गुजरातमधूनच लढवावी असा टोला राजू झोडे यांनी लगावला. फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री असतांना एकही मोठा प्रकल्प विदर्भात आला नाही. विदर्भातील तरुणांना रोजगार मिळाला नाही.रामदेव बाबा यांच्या पतंजलीचा मोठा प्रकल्प नागपूरमध्ये येणार असे सांगितले होते परंतु तोही अद्याप आलेला नाही. विदर्भातील जनतेवर व येथील बेरोजगारावर अन्याय करणारे व विदर्भाच्या मातीशी बेईमानी करणारे गुजरातच्या नेत्यांना मुजरा करतात ही फार मोठी शोकांतिका आहे. येणाऱ्या काळात विदर्भवादी अशा बेईमानांना धडा शिकवणार व त्यांना त्यांची जागा दाखवणार अशी खोचक प्रतिक्रिया राजू झोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
